Yogi Adityanath : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्तेवर आल्यापासून त्यांनी महिलांच्या सुरक्षेवर भर दिला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इशारा दिला की, ‘जो कोणी राज्यातील मुलींच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न करेल त्याचे त्याला रावण आणि कंसासारखी शिक्षा मिळेल.’
बलिया जिल्ह्यातील बांसडीह येथे नारी शक्ती वंदन संमेलनाला संबोधित करताना, आदित्यनाथ यांनी ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना’ पुढील अधिवेशनापासून २५,००० रुपये देऊन राज्यातील मुलींप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे महत्त्वपूर्ण प्रदर्शन म्हणून अधोरेखित केले. “हे पैसे मुलींच्या पालकांना सहा टप्प्यात दिले जातील,” असे मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सरकार ‘मुख्यमंत्री सामाजिक विवाह योजने’अंतर्गत पात्र कुटुंबांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी 51,000 रुपये देत आहे. यादरम्यान आदित्यनाथ पौराणिक पात्रांचा उल्लेख करताना म्हणाले, ‘मुलींची सुरक्षा सुनिश्चित करण्याची सरकारची वचनबद्धता आहे. मुलींच्या सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्यांना रावण आणि कंसासारखेच परिणाम भोगावे लागतील.’
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळीत सरकार मोफत गॅस सिलिंडर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील महिलांना स्वयंपाकाच्या चुलीतून निघणाऱ्या धुराच्या घातक परिणामांपासून मुक्त करून त्यांना दिलासा देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. 17 ऑक्टोबर रोजी बुलंदशहरमध्ये या उपक्रमाची घोषणा करताना आदित्यनाथ म्हणाले होते की सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील सुमारे 1.75 कोटी कुटुंबांना फायदा होईल.
महिला आरक्षण विधेयकाचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, ”२०२६ मध्ये सीमांकन झाल्यानंतर लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले जाईल. विधानसभा आणि लोकसभेत महिलांची संख्या एक तृतीयांश होईल. यासाठी आपण सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहे”