मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरु झाले असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी लगावला होता. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.
“भाजपचा लाऊड स्पीकर काल शिवतीर्थावर वाजत होता. काल राज ठाकरेंची नाही, भाजपची सभा झाली. राज ठाकरेंना कालची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिली होती आणि सभेला भाजपचाच भोंगा होता. एवढंच नाही त्यांना मिळणाऱ्या टाळ्या देखील स्पॉन्सर होत्या. अक्कलदाढ एवढी उशीरा कशी काय येते?”
ते पुढे म्हणाले,’लोकांच्याही मनात तेच आल. लोकांना वाटलं कालची सभा भाजपची आहे. मदरशात धाडी हे टाळीचं वाक्य आहे असं वाक्य अनेकदा ऐकेलं आहे. टाळ्या आणि घोषणाही त्यांच्या होत्या. त्यावर न बोललेलं बरं. काल मेट्रो आणि मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्री काम करत आहे. एवढं मोठं ऐतिहासिक काम झालं. अहो त्याच्यावर बोला’ असं राऊत यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.