येरवडा(प्रतिनिधी) – येरवडा पर्णकुटी चौकात येरवडा ठाकरसी हिल पाण्याच्या टाकीला पाणीपुरवठा करणारी लष्कर पाणीपुरवठा केंद्रातील पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. जवळपास एक तास पाणी वाया गेले.
भामा आसखेडहुन होणारा पाणीपुरवठा वीजखंडित झाल्याने लष्कर पाणीपुरवठा केंद्रातुन पाणी घेण्यात आले होते. मात्र जलवाहिनी जीर्ण झाल्याने ती फुटली असल्याचे बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्राचे उपअभियंता सुरेश साखळे यांनी सांगितले. मुख्य रस्त्यावरील चौकातील वाहिनी फुटली होती पाण्याचे फवारे वरपर्यंत उडत होते. यामुळे पर्णकुटी चौकात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
येरवडा वाहतूक विभाग आणि येरवडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.येरवडा भागाला भामा आसखेड होणारा पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने तसेच गढूळ पाणी येत असल्याने लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी केली होती.
शुक्रवारी लष्कर केंद्राकडून पाणीपुरवठा केला असताना ही जलवाहिनी फुटली असे सामाजिक कार्यकर्ते डनियल लांडगे यांनी सांगितले.जुनी पाईपलाईन काढून नवीन लाईन टाकण्यासाठी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सांगन्यात येणार असल्याचे एमआयएमच्या गटनेत्या नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी सांगितले