रुग्ण त्रस्त : “सरकारी काम आणि थोडेसे थांब’ अशी अवस्था
पिंपरी – डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदींची कमतरता, तातडीक सेवा विभागात रूग्णांना तातडीने उपचार देण्याबाबत होणारे दुर्लक्ष, औषधांचा अपुरा साठा, तज्ज्ञ डॉक्टरांचा असलेला अभाव अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात महापालिकेचे पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय (वायसीएम) सापडले आहे. “सरकारी काम आणि थोडेसे थांब’ अशीच अवस्था येथे पाहण्यास मिळत आहे. वैद्यकीय उपचारासाठी होणाऱ्या दिरंगाईमुळे येथे दररोज उपचारासाठी येणारे रूग्ण त्रस्त झाले आहेत.
वायसीएम रूग्णालय हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथे पिंपरी-चिंचवड शहर आणि शहराबाहेरून देखील रूग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णालयावर रुग्ण सेवेचा अतिरिक्त ताण पडतो. रूग्णालयात “दै. प्रभात’च्या प्रतिनिधीने शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन उपचारासाठी येणारे रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी याबाबत संवाद साधला. तातडीक सेवा विभागामध्ये रूग्णांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. काही घटनांमध्ये रूग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. मात्र, त्यामध्ये विलंब होत आहे.
महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत रूग्णाला डिजिटल एक्स-रे काढून दिला नसल्याची माहिती एका रुग्णाच्या नातेवाईकाने दिली. बऱ्याचदा रूग्णांना आवश्यक असलेली औषधे रूग्णालयात मिळत नाही. ही औषधे येथील औषधालयातून किंवा बाहेरील खासगी मेडिकलमधून विकत घ्यावी लागतात. डॉक्टर, वॉर्डबॉय आदींची कमतरता आहे. तातडीक सेवा विभागात मदतकक्ष नसल्याने रूग्णांना उपचारासाठी दाखल करताना योग्य माहिती मिळत नाही, अशा एक ना अनेक तक्रारी रूग्ण आणि त्यांच्या
नातेवाईकांनी केल्या.
चव्हाण रूग्णालय पदव्युत्तर संस्थेमध्ये प्रमुख आजारांवर नियमित लागणारी औषधे उपलब्ध करून दिली जातात. सर्व प्रकारच्या आजारांवरील औषधे उपलब्ध करून देणे खर्चिक आहे. गेल्या वर्षी 600 प्रकारची औषधे उपलब्ध करून दिली होती. पदव्युत्तर संस्थेसाठी 154 तज्ज्ञ डॉक्टर भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. “सीएमओ’ डॉक्टरांच्या सहा पदापैंकी 5 पदे सध्या भरलेली आहेत. रूग्णालयात सध्या 300 ते 325 परिचारिका आहेत. उपाहारगृह रूग्णालयाबाहेर घेण्याचे नियोजन सुरू आहे. निवासी डॉक्टरांची कमतरता सध्या जाणवते आहे. पदव्युत्तर संस्थेसाठी परवानगी मिळाल्यानंतर ही कमतरता जाणवणार नाही.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण
रूग्णालय पदव्युत्तर संस्था.
महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधणार
रुग्णांना जाणवणाऱ्या विविध समस्यांबाबत नगरसेवक प्रमोद कुटे यांनी शनिवारी (दि. 2) प्रत्यक्ष रूग्णालयाला भेट देऊन अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याशी चर्चा केली. कुटे म्हणाले, “”रुग्णालयात परिचारिकांची संख्या अपुरी आहे. नवीन रूग्ण उपचारासाठी दाखल करण्यासाठी एक ते दीड तास विलंब होतो. “सीएमओ’ डॉक्टरांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. रुग्णालयात बालकांसाठी नव्याने केलेला 30 खाटांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) परिचारिकांच्या अपुऱ्या संख्येमुळे वापराशिवाय पडून आहे. पर्यायाने, नवजात बालकांना उपचार मिळण्यात अडचणी जाणवत आहेत. या सर्व समस्यांबाबत महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरे उपस्थित करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे.”