कळस – ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे द्राक्षबागांवर विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष बागांवर डाऊणी आणि भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. टोमॅटो, मिरचीवर करपा, शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कळस परिसरातील गोसावीवाडी, बागवाडी, बिरंगुडी, बोरी, वायाळवस्ती परिसरातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
इंदापूर तालुक्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरण आणि सतत कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे धोक्याची घंटा खणखणू लागली आहे. सप्टेंबरच्याप्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याचा धोका वाढला आहे. फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे डिपिंग करण्यास सुरुवात केली आहे. खराब झालेला शेंडा तोडून टाकण्याचे काम हाती घेतले आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली आहे. नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. द्राक्ष बागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे.
सध्या फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसला आहे. फुलोऱ्यांतील बागांचे घड कमकुवत तयार होणे अथवा प्रारंभिक अवस्थेतच जिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. द्राक्षबागांच्या ऑक्टोबर छाटणीचा कालावधी सुरू असतानाच ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाल्यामुळे नव्याने छाटणी करण्यात आलेल्या बागांनाही रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. आता फुलोऱ्यातील बागांवर डिपींगच्या साह्याने रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्याची वेळ
आली आहे.
सतत पावसामुळे ज्या बागा पोंगा अवस्थेत आहेत. त्यांच्यातही घड जिरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याचे प्रमाण अजून वाढू शकते. सध्या रोगांपासून बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा 20 ते 30 टक्के खर्च केवळ बुरशीनाशकांवर होत आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे नुकसान व वाढलेला भरमसाठ खर्च यातून बागायतदारांच्या हाती नेमके काय लागणार, हाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्या बागांची वेळेवर छाटणी झाली आहे. किंवा ज्या बागा पोंगा किंवा फुटण्याच्या अवस्थेत आहेत. त्यांच्यात डाऊनी रोगाचा मोठा धोका झाला आहे. सद्यस्थितीत बागा वाचवणे देखील आव्हानाचे झाले आहे. एस. एस, सीडलेस, जंबो आदी वाणांचेही नुकसान होणार आहे. या वाणांना मागील वर्षीच माल कमी होता. एप्रिलमध्ये पाण्याचा ताण सहन करावा लागला होता. पाऊस पडून गेल्यानंतरही घडकुजीचे लक्षण दिसण्यास काही अवधी लागतो. त्यामुळे रोगराई शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.
फवारण्या करूनही शेतकरी हतबल –
सततचा पाऊस, धुके, ढगाळ वातावरणाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे घड आणि फळकुजीमुळे 50 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. बागायतदारांना लाखों रुपयांचा थेट फटका बसल्याचा अंदाज आहे. प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षावर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने खर्चाला सुमार राहिला नसून, फवारण्या करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नुकसानग्रस्त बागांचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ज्या बागा पाच ते सहा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत छाटल्या आहेत. त्या फुलोरावस्थेत आहेत. त्यांच्यात घडकूज ही समस्या तयार झाली आहे. हे नुकसान सुमारे 20 टक्क्यांपासून ते 40 ते 50 टक्क्यांपर्यंत आहे. असाच पाऊस झाल्यास नुकसानीची तीव्रता वाढणार आहे. या बागांचा माल जानेवारी ते फेब्रुवारीत सुरू होणार असल्याने त्यांना मोठ्या उत्पादनघटीला सामोरे जावे लागणार आहे.
– दादासाहेब वायाळ, -वैभव मोहळकर, द्राक्ष बागायतदार, कळस.