नवी दिल्ली – गुरुवारी दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी 208.46 मीटरवर पोहोचली आहे. हे धोक्याचे चिन्ह 205 मीटरपेक्षा 3 मीटरने जास्त आहे. त्यामुळे राजधानीच्या वजिराबाद येथील सिग्नेचर ब्रिजजवळील गढी मांडू गाव पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे.
त्यापार्श्वभूमिवर, यमुना नदीच्या काठावर असलेल्या सखल भागातून 16,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
हरियाणातील हथनी कुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यानंतर यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत आहे.
यमुना वजिराबाद ते ओखला 22 किमी अंतरावर आहे. गुरुवारी दुपारपर्यंत पाण्याची पातळी 209 मीटरपर्यंत पोहोचल्यावर बहुतांश भाग पाण्याखाली जाण्याची भीती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे. या सर्व पार्श्वभूमिवर एनडीआरएफच्या 12 तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, 2,700 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत.
यासह, हरियाणामध्येही यमुनेचे पाणी 13 जिल्ह्यांमध्ये दाखल झाले आहे. हरियानातील 240 गावे पुराच्या तडाख्याखाली आहेत. हळुहळू यमुनेचे पाणी आता आणखी वाढत असल्यामुळे जिंद, फतेहाबाद, फरीदाबाद, पलवल आणि सिरसा या पाच जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे.
तर दुसरीकडे, उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यात बुधवारी 3 जण नदीत वाहून गेले. चमोली जिल्ह्यात 5 ठिकाणी दरड कोसळल्याने बद्रीनाथ महामार्ग बंद आहे. गंगोत्री, यमुनोत्री आणि रुद्रप्रयाग महामार्गही बंद आहेत. चमोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा बंद राहणार आहेत.