पुणे- मार्केटयाडात व्यापाऱ्यांकडील मालाची तपासणी न करताच सील करणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. या बाबीचा परिणाम व्यापारावर होत असल्याचा आरोप दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यावेळी उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक वालचंद संचेती, राजेंद्र बाठिया, प्रवीण चोरबेले, संचालक रायकुमार नहार आणि कन्हैय्यालाल गुजराथी आदी उपस्थित होते.
दि.22 ऑक्टोबर रोजी एफडीए प्रशासनाने मार्केटयार्डात कारवाई केली. यामध्ये व्यापाऱ्यांकडून सुमारे 36 लाख रुपयांचा माल सील करण्यात आला. एफ.एस.एस.ए.आय कायद्यातील काही तरतुदी अव्यवहार्य असून त्यांचे पालन करणे बंधनकारक आहेत. या तरतुदींचा आधार घेऊन मालाचे नमूने घेऊन माल सील केला जात आहे. वास्तविक व्यावसायिक कारवाई झालेल्या मालाचा उत्पादक नसून फक्त विक्रेते आहेत. नामांकित कंपन्यांकडून ज्या स्थितीत माल प्राप्त झाला आहे. त्या स्थितीत तो विक्री केला जातो. या कंपन्यांकडून माल संपूर्ण देशात विक्री केला जातो.
व्यावसायिक माल कायद्यानुसार आवश्यक त्या वॉरंटीनुसार खरेदी करतात. सर्वच पॅकबंद माल व्यावसायिकाने खासगी लॅबमध्ये तपासणी करुन शक्य नाही. तसेच, जे व्यावसायिक सुट्या मालाची खरेदी करुन रिपॅकिंग करतात, असे व्यावसायिक संबंधित मालाचा तपासणी अहवाल मालासोबत कंपन्यांकडून मागवत असतात. माल पोहोचल्यानंतर माल तपासून मगच त्याचे रिपॅकिंग केले जाते. मालाची तपासणी करण्यासाठी आमची हरकत नाही.
मात्र, सील केल्यामुळे मालाची रक्कम तसेच जागा गुंतून पडते. त्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे ओस्तवाल यांनी म्हटले आहे. आम्ही काय काळजी घेतली म्हणजे माल सील होणार नाही, याचा खुलासा केल्यास व्यवसाय करणे शक्य होईल.
अन्यथा, सणासुदीच्या दिवसात मागविलेल्या मालावर कारवाई झाल्यास पुढील माल मागविणे शक्य होणार नाही. त्यामुळे मालाचा पुुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कायदा राबविताना फक्त तरतुदींचा विचार न करता व्यवहार्य पद्धतीने ग्राहकांना चांगला माल मिळावा याचा विचार केला जावा अशी मागणीही ओस्तवाल यांनी केली.