Pune : माथाडी कायद्याची राज्यभरात सर्व ठिकाणी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घ्यावे या मागण्यांसाठी कामगार संघटनांनी राज्यातील सर्व बाजार समित्यामध्ये बंद पुकारला आहे.
सोमवार दि. २६ रोजी होणार्या या बंदमध्ये पुण्यातील सर्व कामगार संघटना आणि आडते सहभागी होणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिली. बंदबाबतचे निवेदन सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांना देण्यात आलेले आहे.
दरम्यान या दिवशी शेतकर्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आलेले आहे. या दिवशी जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदान, मुंबई येथे सर्व संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक ३४ मांडण्यात आलेले आहे. हे विधेयक मागे घ्यावे. माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना प्राधान्यांने नोकर्या द्याव्यात. लोकशाही पध्दतीने व्यवस्थित बाजार समित्या सुरू आहेत. त्यांचे केंद्रीकरण करण्याची गरज नसल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.