भुजबळांसमवेतच्या कलगीतुऱ्याच्या चर्चेवर अजित पवारांचे भाष्य
बारामती/जळोची – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या बैठकीमध्ये मी आणि छगन भुजबळ शेजारी शेजारी बसलो होतो. आम्ही गप्पा मारत होतो. मात्र काही माध्यमांनी त्याचा विपर्यास केला. आमच्यात कलगीतुरा रंगला अशी चर्चा झाली. भुजबळ व मी आपापली भूमिका मांडली यामध्ये चुकले काय? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार केला.
बारामती येथे रविवारी (दि. 1) शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या निधीमधून बारामती व दौंड तालुक्यातील माध्यमिक शाळांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपले म्हणणे मांडले म्हणजे आपल्यात मतभेद आहेत असे समजण्याचे काही कारण नाही. अशीही स्पष्टोक्ती पवार यांनी केली.
पवार पुढे म्हणाले, कॉन्ट्रॅक्ट भरती बाबत उगीचच गैरसमज पसरवले जात आहेत. ही तात्पुरत्या स्वरूपात केली जाणारी भरती असेल. नियमित भरती झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट वरील व्यक्तीस काढून टाकले जाईल. मात्र हे कोणी समजून घेत नाही.
खासगी अकॅडमीचालकांना इशारा
आपल्याकडे खासगी अकॅडमीचे इतके पेव फुटले आहे. कुठून तरी परवानग्या आणतात, कोणाशी तरी टाईप केले जाते. दोन-दोन लाख रुपये फी गोळा केली जाते. यांच्यामुळे सर्व शाळा ओस पडू लागल्या आहेत. याबाबत काय निर्णय घेता येईल याकडे मी स्वतःहून लक्ष घालणार आहे. 50 टक्के गुण दहावी बारावीच्या अभ्यासक्रमाला व 50 टक्के सीईटीला, असे काही करता येईल का याबाबत पाहतो, असा देखील इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.