पौगंडावस्थेत प्रवेश करत असताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल हा खरोखर एक वादळी काळच असतो. हे सहजपणे समजून घेतले तर काहीच अडचणी निर्माण होत नाहीत, हे नक्की.
सुजय व त्याचे बाबा स्वतःहून समुपदेशनासाठी आले होते. सुजयला बाहेर बसवून बाबा एकटेच आत आले व त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. सुजयचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. तर आई गृहिणी होती. सुजय यावर्षी नववीमध्ये होता.
“तो खूप हुशार आणि चांगला मुलगा आहे. वर्गात नेहमी पहिल्या 5/6 नंबरमध्ये तो असतो. शाळेतली त्याची वर्तणूकदेखील चांगली आहे. आतापर्यंत आम्हाला शाळेतून सुजयबद्दल कधीही कोणती तक्रार आलेली नाही. त्याचा स्वभाव चेष्टेखोर, मस्तीखोर आहे; पण इतरांना त्रास होईल अशी मस्ती तो कधीच करत नाही; तेवढा तो समजूतदार आहे.
पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वागण्यात बदल व्हायला लागल्याचं त्याच्या आईच्या आणि माझ्या दोघांच्याही लक्षात आलं. हल्ली त्याचा बराचसा वेळ आरशासमोर जातो. सारख्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करून बघणं त्याला फारच आवडतं. त्या बाबत त्याला काही बोललं तर लगेच चिडतो. सध्या त्याला पिक्चर बघायला आणि हिरो-हिरॉईन्सची गाणी बघायलाही फारच आवडतं. सतत टीव्हीवर गाण्यांचे चॅनल्स चालूच असतात.
अभ्यासाकडेही त्याचं दुर्लक्ष होतंय. परीक्षेतल्या मार्कांवरूनच ते लक्षात येतंय. त्याला याबाबत समजावून सांगितलं की, त्याला त्याची चूक कळते आणि पुढचे काही दिवस तो नीट वागतोही. पण काही दिवसांनी “ये रे माझ्या मागल्या…’ आम्ही त्याला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. पण आम्हाला अपेक्षित बदल त्याच्यात दिसत नाहीत.
तो वयात येत असल्याने त्याच्यात हे बदल होत आहेत. हे आम्हाला समजतंय पण त्याच्याशी या विषयावर कसं बोलावं, हे आम्हाला समजत नाहीये. परवा मी सहज त्याची बॅग पहात होतो तर त्यात मला काही अयोग्य माहिती असलेली दोन पुस्तकं लपवलेली सापडली. मला खरं तर खूपच राग आला होता.
पण मी त्याला रागवलो नाही. त्याच्यातले हे बदल कसे हाताळावेत यासाठी तुम्ही समुपदेशन कराल का? कारण आमच्याच नात्यातल्या एका मुलाच्या आई-वडिलांनी हे सारे अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने त्या मुलाने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
असे माझ्या मुलाच्या बाबतीत घडू नये यासाठी मी त्याला तुमच्याकडे घेऊन आलोय.’
सुजयच्या बाबांचे बोलणे झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी कोणताही चुकीचा निर्णय न घेत दाखवलेल्या संयमासाठी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर सुजयची भेट घेऊन त्याच्याबरोबर ओळख करून घेतली व पुढील सत्र निश्चित करून सुजयला एकटे भेटीसाठी बोलावले.
ठरल्याप्रमाणे सुजय भेटीसाठी आला. सुरुवातीला तो बोलण्यासाठी थोडा घाबरत होता. पण हळूहळू ओळख व विश्वास वाढल्यावर तो मोकळेपणाने बोलायला लागला. दोन-तीन सत्रांत चांगला विश्वास संपादन झाल्यानंतर पुढील काही सत्रांमध्ये त्याच्यातील झालेले बदल, त्यामागील कारणे, वयात येणाचा अर्थ, वयात येताना होणारे शारीरिक व मानसिक बदल, वाढणारे शारीरिक आकर्षण, विचारात होत जाणारे बदल या साऱ्याबाबत सविस्तर शास्त्रीय माहिती दिली.
त्याच्या मनात असणाऱ्या अनेक शंकांचं समाधानकारक निरसन केलं. तसेच हे बदल त्याने कसे हाताळावेत, हे योग्य पद्धतीने न हाताळले गेल्यास कोणकोणते धोके निर्माण होऊ शकतात. याबाबतही समुपदेशन केले.
या साऱ्याला सुजयनं चांगला प्रतिसाद दिला. दरम्यानच्या काळात सुजयच्या पालकांचीही सत्रे घेऊन सुजयमधील हे बदल कसे हाताळावेत, अती बंधनांचा अतिरेक कसा व का टाळावा? त्याच्याबरोबर वागताना – बोलताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबतही त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे सुजयचं वयात येणं त्याच्या स्वतःकडून तसेच आई-वडिलांकडून अतिशय सुंदर प्रकारे हाताळले गेले.
मुला-मुलींचा वयात येण्याचा काळ हा नावाप्रमाणेच मुलं आणि आई-वडील यांच्यासाठी “वादळी काळ’ असतो. मुलांमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, वैचारिक पातळीवर बरेच मोठे बदल होत असतात. मुलांना त्यामागील शास्त्रीय कारणं माहीत नसतात आणि आई-वडिलांना हे बदल स्वीकारणं आणि हाताळणं अवघड जात असतं.
त्यामुळे बऱ्याचदा दोघांच्या दृष्टीने हा काळ संघर्षाचा आणि तणावाचा ठरतो. पण पालक मित्रांनो मुलांमधील हे बदल हाताळताना त्यांच्यावर अनाठायी बंधने घातली किंवा त्यांना सतत रागावले, मारले, चिडले तर या साऱ्याला अयोग्य, काही प्रमाणात घातक वळण लागण्याची शक्यता वाढत जाते. याउलट सुजयच्या बाबांप्रमाणे संयमाने, धिराने व योग्य मार्गाने हे वय हाताळलेत तर हे “वादळी वय’ हाताळणे तुम्हाला आणि मुलांना सोपे, सुखकर जाणार नाही का?
(केसमधील नाव बदलले आहे.)