कराड – येथील मंगळवार पेठेत पांढरीचा मारूती मंदिर परिसरात बुधवारी सकाळी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रतिकात्मक कबर काढून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून निषेध करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली. पालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ सदर ठिकाणी भेट देत खड्ड्यावरील मुख्याधिकारी डांगे यांची प्रतिमा हटवली असली तरी सोशल मिडियाद्वारे ही पोस्ट व्हायरल झाल्याने शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.
तसेच मंगळवारी दुपारी ड्रेनेजसाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचेच हे पडसाद असल्याची चर्चाही सुरू होती. कराड शहरात स्वच्छतेचे वारे वाहत असलेतरी रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्याबाबत कोणीही अधिकारी वा पदाधिकारी बोलायला तयार होत नाहीत. रस्त्यांच्या अवस्थेमुळे लहान-मोठे अपघात सतत घडत असतात. मंगळवारी दुपारी तर खोदकाम केलेल्या खड्ड्यात पडून एकाचा जीवही गेला. पालिकेचे दुर्लक्ष व ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळेच ही घटना घडल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे.
पालिकेकडून शहरातील विविध विकासकामांची टेंडर ठराविक ठेकेदारांना दिली जातात. एकदा टेंडर दिले की आपले काम संपले. पुन्हा संबंधित ठेकेदाराकडे कामाबाबत सततचा पाठपुरावा केला जात नसल्याने ठेकेदारही मुजोर झाले आहेत. आपल्याला कोणी विचारणारे नाही असाच त्यांचा समज झाला असावा. त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे कितीही दिवस काम सुरू ठेवले जाते. पाईपलाईनच्या नावाखाली अनेक दिवस रस्त्यावर खड्डे पडलेले असतात. त्याचा त्रास नागरिकांना होतो. रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे अनेकवेळा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. तरीही पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. उकरलेल्या रस्त्यांमुळे शहरात धुळीचे प्रमाणही वाढले आहे. त्याचाही नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकवेळा तक्रार करूनही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी एकाचा बळी गेला.
सुर्यवंशीमळा ते बर्गेमळा या दरम्यान ड्रेनेजच्या पाईपलाईनसाठी सुमारे 20 ते 25 फूट खोल खड्डा खणण्यात आला होता. मात्र तेथे कोणत्याही प्रकारचा सूचनाफलक लावण्यात आला नव्हता. गेल्या सहा महिन्यांपासून हे काम सुरू आहे. तेथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. या खड्ड्यात पडून एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला. शहराला स्वच्छ-सुंदर बनविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. परंतु दुसरीकडे माणसांच्या जिविताचा खेळ त्यांनी थांबविला पाहिजे. या सर्वांवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा अंकुश असणे गरजेचे आहे. मात्र त्यांचे सर्व लक्ष स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेवर असल्याचे दिसते अशीही चर्चा शहरातील नागरिकांमधून सुरू आहे.
मंगळवारी घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून काही अज्ञातांनी पांढरीचा मारूती मंदिर परिसरात कबर खोदून मुख्याधिकारी डांगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला होता. पालिका कर्मचाऱ्यांनी प्रतिमा तात्काळ हटवली असली तरी त्याची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती. शहरात घडत असलेल्या अनेक घटनांबाबत शहराचे मुख्याधिकारी म्हणून त्यांचीच जबाबदारी असून त्यांना आतातरी जाग यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प
कराड नगरपालिकेचे सर्वच लोकप्रतिनिधी शहर विकासाबाबत बोलताना दिसतात. वास्तविक पाहता ते लोकांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे त्यांनी चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींवर बोलणे गरजेचे असते. परंतु शहरात घडत असलेल्या अनेक दुर्घटनांबाबत त्यांच्यामधून कोणीच आवाज उठवलेला दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी घंटागाडीमुळे एका निष्पाप मुलाचा जीव गेला. त्यानंतर मंगळवारी खड्ड्यात पडून आणखी एकाचा बळी गेला. यावर एकाही लोकप्रतिनिधींनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांच्यावर कोणाचा अंकुश आहेत म्हणून ते मूग गिळून गप्प आहेत का असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.