नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठीचे आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना केले. ‘चाचणी करा, रुग्णशोध घ्या व उपचार करा’ या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला. या सर्वामध्ये सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आता समोर आली आहे.
गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरपासून ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यासोबतच करोना रुग्णसंख्या १ कोटी १४ लाखांवर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात बुधवारी तब्बल २३ हजार १७१ नव्या रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्रात बुधवारी २४ तासांत २३,१७९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ८४ जणांचा मृत्यू झाला. मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यासह राज्यातील सर्वच भागांमध्ये रुग्ण वाढले आहेत. सप्टेंबरनंतर राज्यात प्रथमच इतकी मोठी दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली. राज्यात ११ सप्टेंबरला सर्वाधिक २४,८८६ दैनंदिन रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली.
मात्र, आता रुग्ण वाढत असून, दिवसभरात मुंबई २३७७, नाशिक शहर १४९०, पुणे शहर २६१२, पिंपरी-चिंचवड १२०६, उर्वरित पुणे जिल्हा ९०६, औरंगाबाद ९७९, नागपूर शहर २६९८, कल्याण-डोंबिवली ६३७, सातारा ३०३, अकोला शहर ३०३, बुलढाणा ५३२, वर्धा ३६० नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या १ लाख ५२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्ह््यात सर्वाधिक ३२,३५९ रुग्ण उपचाराधीन आहेत.