मुंबई – अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वाझे एनआयएच्या ताब्यातआहेत. एएनआयच्या तपासात अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी पार्क केल्यानंतर काही तासांनी वाझे आपला चेहरा झाकून आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसुख हिरेनप्रमाणे सचिन वाझे यांचीही हत्या होऊ शकते, अशी भीती भाजप आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली आहे.
रवी राणा म्हणाले कि, सचिन वाझेंनी तपासात एनआयएला जी माहिती दिली आहे त्यावरुन महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त परमबीर सिंग यांना बाजूला करुन हे प्रकरण संपणार नसून याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या भोवती फिरत आहेत. सचिन वाझेंना प्लानिंग करण्यासाठी कोणी मदत केली हेदेखील लवकरच पुढे येईल.
तसेच, ज्याप्रकारे हिरेन यांचा मृत्यू झाला त्यानुसार सचिन वाझे यांच्याही जीवाला धोका आहे. मातोश्री अडचणीत असून सचिन वाझेंच्या जीवाला धोका आहे. म्हणून मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवले पाहिजे. एनआयने त्यांना संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.