नवी दिल्ली – भारतात करोनाची तिसरी लाट आता अटळ आहे, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननेच दिला आहे. तिसरी लाट अगदी तोंडावर आली असून, अशा स्थितीत लोकांच्या वावराबाबत जी ढिलाई दाखवली जात आहे ती अत्यंत धोकादायक आहे, असेही या संघटनेने म्हटले आहे.
भारत नुकताच कसाबसा दुसऱ्या लाटेच्या बाहेर आल्याचे चित्र देशभर निर्माण झाले असतानाच आता हा नवीन धोका निर्माण झाला आहे.
जागतिक स्तरावर सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचे पुरावे आणि महामारीचा पूर्व इतिहास पाहता तिसरी लाट आता अटळ आणि अपरिहार्य आहे, असेही या संघटनेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आता पर्यटन, धार्मिक यात्रा व उत्सव या सर्वांना पुढील काही महिने तरी फाटा द्यावा लागणार आहे, असे या संघटनेने म्हटले आहे.
लसीकरणाशिवाय सर्वत्र मोकाट फिरणारे लोक हे करोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. पुढचे दोन ते तीन महिने तरी कोणतीही रिस्क घेतली जाऊ नये, असे आवाहनही आयएमएच्या अध्यक्षांनी केले आहे.