ICC World Cup 2023 Team India -विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 21 व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. त्यानंतर आता थेट 29 ऑक्टोबरला भारतीय संघ इंग्लंडशी खेळणार आहे. त्यापूर्वी असलेला 6 दिवसांचा वेळ भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या कुटुंबाला देता यावा यासाठी बीसीसीआयने त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी जर खेळाडूंनी कुटुंबासाठी वेळ दिला तर ते या विश्रांतीमुळे पुन्हा ताजेतवाने होऊन स्पर्धेत परततील. इंग्लंडविरुद्धचा सामना 29 तारखेला असल्याने भारतीय संघाचे खेळाडू एक दिवस आधी म्हणजे 28 तारखेला लखनौ येथे एकत्र येतील व संध्याकाळी होत असलेल्या सराव सत्रात सहभागी होतील, असे बीसीसीआयने म्हटले आहे. भारतीय संघातील कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्यासह सर्व खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफलाही ही विश्रांती दिली जाणार आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये आशिया करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळवली गेली होती. त्यात भारतीय संघातील सर्व प्रमुख खेळाडू खेळले होते. त्यानंतर लगेचच संघ विश्वकरंडक स्पर्धा खेळत आहे. त्यामुळे आता जे सहा सात दिवस हातात मिळाले आहेत, तो विश्रांतीचा कालावधी खेळाडूंसाठी रिफ्रेश होण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा ठरेल व स्पर्धेतील उर्वरित चार सामने खेळण्यासाठी भारतीय संघ ताजातवाना झालेला असेल.
पंड्यालाही ही विश्रांती महत्त्वाची..
बांगलादेशविरुद्धच्या लढतीत आपल्याच गोलंदाजीवर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना हार्दिक पंड्याच्या पायाचा घोटा दुखावला होता. त्यामुळेच त्याला रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. या विश्रांतीमुळे त्यालाही काही दिवस मिळतील व तो इंग्लंडविरुद्धच्या लढतीसाठी पूर्ण मॅचफिट ठरेल, असेही संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.
पुढील सर्व सामने महत्त्वाचे…
भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत पाच सामने खेळले आहेत अन् पाच सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. आता भारतीय संघाला अजून चार सामने खेळायचे आहेत. स्पर्धेतील अन्य संघांच्या कामगिरीवर गुणतालिकेतही फेरबदल होत आहेत. त्यामुळे जर भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठायची असेल तर पुढील चारही सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत खेळाडूंना मिळणारी विश्रांती अत्यंत महत्त्वाची ठरेल, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.