नवी दिल्ली :- भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दोन दिवसांपूर्वीच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी भारतीय संघाची निवड जाहीर केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा येत्या काही दिवसांत त्यात काही बदल होणार असल्याचे संकेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी दिले आहेत.
या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांना संघाबाहेर ठेवले गेले. फलंदाजी खोलवर ठेवण्यासाठी अष्टपैलूत्वाला प्राधान्य देण्यात आले. संघ जाहीर झाला तेव्हा आगरकर आणि रोहित यांनी निवडीचे समर्थन केले होते.
या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा संघ सादर करण्यासाठी आयसीसीने 5 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, या संघात 28 सप्टेंबरपर्यंत बदल करण्याची मुभा आयसीसीकडून मिळाली असल्याने भारतीय संघात काही बदल होऊ शकतात.
त्यातच भारतीय संघ आशिया करंडक स्पर्धेनंतर मायदेशातच ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान खेळणार आहे. त्यामुळे त्या मालिकेतील कामगिरीच्या आधारे एखाद्या खेळाडूला विश्वकरंडक स्पर्धेची लॉटरी लागू शकते.
त्यामुळे आता बीसीसीआय 28 सप्टेंबरपर्यंत आपल्या वर्ल्ड कपच्या संघात बदल करू शकते. मात्र, त्यानंतरही संघात काही बदल करायचे असतील तर बीसीसीआयला आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल.