बंगळुरू :– डीआरएस नियमात अम्पायर कॉल कशासाठी ठेवला आहे हेच समजलेले नाही. मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरुद्धच जर दाद मागितली जाते, तर मग त्यानेच दिलेला निर्णय तिसरा पंच कायम कसा ठेवू शकतो, त्यामुळेच अम्पायर कॉल अर्थहीन आहे, अशा परखड शब्दांत भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हरभजनसिंग याने टीका केली आहे.
भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज तबरेझ शम्सी मैदानावरील पंचाकडून पाकिस्तानच्या हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर पायचीत बाद दिला गेला होता. याविरुद्ध त्याने डीआरएस घेतला. मात्र, तिसऱ्या पंचांनीही तो बाद असल्याचाच निर्वाळा दिला. रिप्लेमध्ये चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जात असल्याचे स्पष्ट दिसत असूनही तिसरे पंच मैदानावरील पंचाचाच निर्णय कायम कसा ठेवू ठकतात. असेच जर असेल तर मग डीआरएसलाच काही अर्थ उरत नाही, असेही हरभजन म्हणाला.
आयसीसीने या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची गरज आहे. मैदानावरील पंच चुकला असेल तर त्यात सुधारणा करण्यासाठीच तिसरा पंच असतो. हरभजनसिंगच्या या मताला ग्रॅमी स्मिथ, हर्ष भोगले, मिस्बाह-उल-हक यांनीही पाठिंबा दिला आहे. या नियमातील त्रुटीमुळेच हा सामना पाकिस्तानने गमावला. डीआरएस जर मैदानावरील पंचांकडून झालेल्या चुकीत सुधारणा करण्यासाठी उपलब्ध केलेला आहे तर मग अशा घटना का होतात. तंत्रज्ञानाची मदतच घ्यायची नसेल तर मग असे नियमच का तयार केले जातात, असेही हरभजन याने म्हटले आहे.
तंत्रज्ञानाची मदत महत्त्वाची…
मैदानावरील पंच केवळ अंदाज बांधून पायचितबाबत निर्णय देतात. जर त्यांच्या मदतीला तंत्रज्ञान असेल तर चूक होणार नाही. पायचितबाबत तिसरा पंच रिप्ले पाहून योग्य निर्णय देऊ शकतो. मग अशा वेळी अम्पायर कॉल कशासाठी कायम ठेवला जातो, असा प्रश्न निर्माण होतो. पायचितबाबत म्हणायचे तर मैदानावरील पंचांचे निर्णय 50 ते 70 टक्के वेळा चुकीचे असल्याचेही अनेक सामन्यांतून दिसले आहे. त्यामुळेच आता आयसीसीने फेरविचार केलाच पाहिजे, अशी आग्रही मागणीही हरभजनने केली आहे.