जालना – मराठा आरक्षणासाठी (Maratha Arakshan) येथील आंतरवाली सराटी येथे अंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange patil) यांचे चालू असलेल्या आमरण उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस होता. त्यात जरांगे-पाटीलांनी सलग चार दिवस अन्नपाणी, औषधी न घेतल्याने मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. रविवारी सकाळी पत्रकार परिषदेदरम्यान जरांगेंना हातात माईकही धरणे शक्य होत नव्हते. त्यांचा हात थरथर होत होता. तसेच, बसून बोलण्यासही जरांगेंना त्रास जाणवत होता. त्यामुळे दोन-तीन शब्द बसून बोलल्यानंतर मनोज जरांगेंनी पडूनच आपले बोलणे पूर्ण केले.
जरांगे-पाटील (Jarange Patil) म्हणाले, आम्ही एक पाऊल मागे घेत सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. तरीही सरकारकडून अजून काहीही उत्तर आलेले नाही. सरकारकडून काहीही संवाद साधण्यात आलेला नाही. आता आम्ही दोनच दिवस वाट पाहणार आहोत. सरकारला माणुसकी समजत नसेल तर त्यांना मराठा समाज त्यांच्याच भाषेत उत्तर देईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मीडियाच्या कॅमऱ्यासमोर चर्चा होत नसते, समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाही. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायले पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे म्हणाले.
आंतरवालीत गर्दी वाढली…
सध्या मराठा आरक्षणासाठीच्या अंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आंतरवाली सराटी (Antarwali Sarati) गावात आता दिवसेंदिवस राज्यभरातील मराठा बांधवांची गर्दी वाढताना दिसत आहे. सोबतच परिसरात असलेल्या गावातील गावकरी देखील उपोषणास्थळी येत आहे. रविवारी पाचव्या दिवशी तर सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी करायला सुरवात केली आहे.