नवी दिल्ली – भारतीय तिंरदाजी संघटनेत दोन संस्था असल्याने त्या संघटनेत सध्या वाद आहे आणि याच वादाचा फटका भारतीय तिरंदाजी संघटनेला बसला आहे. जागतिक तिरंदाजी संघटनेने भारतीय तिरंदाजी संघटनेवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जागतिक तिरंदाजी संघटनेने 5 ऑगस्ट रोजी भारताविरुद्ध ही कारवाई केल्याची माहिती आपल्या संकेतस्थळावर आणि अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.
NEWS. World #Archery suspends Archery Association of India ?? on 5 August 2019 ?? https://t.co/heioqddO1t
— World Archery (@worldarchery) August 8, 2019
जागतिक तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस टॉम डिलन यांनी म्हटले आहे की, भारतीय तिरंदाजी संघटनेला जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, भारतीय तिरंदाजी संघाच्या प्रशासनाकडून याबाबत कोणताही निर्णय न घेण्यात आल्याने जागतिक संघटनेने भारताला निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.
येत्या सोमवार पासून हा आदेश लागू होणार आहे , भारतीय तिरंदाजी संघातील खेळाडू 19 ते 25 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या जागतिक तिरंदाजी चषक स्पर्धेत भाग घेणार आहेत. मात्र, यानंतरच्या भारतीय खेळाडुंच्या भवितव्याविषयी साशंकता आहे.
याच कारणामुळे बंदी-
भारतीय तिरंदाजी संघटनेच्या जून महिन्यात एकाच वेळी नवी दिल्ली आणि चंडीगढ येथे दोन निवडणुका पार पडल्या. यामध्ये संघटनेने अर्जुन मुंडा आणि बीव्हीपी राव या दोन अध्यक्षांची नियुक्ती केली असून मुंडा यांना 20 राज्य संघटनांचा तर राव यांना 10 संघटनांचा पाठिंबा आहे. यापैकी कोणाची संघटना वैध याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसून यात सध्या वाद असून उच्च न्यायालयात याबाबत निर्णय येणे बाकी आहे. जागतिक महासंघाने या निवडणुकीसाठी काझी रजिब उद्दिन अहमद चापोल यांना निरीक्षक म्हणून पाठवले होते. पण एकत्रित निवडणूक घेण्यास कुणीही तयार दर्शविली नाही. त्यामुळे दोन समांतर संघटना स्थापन केल्याबदल भारतीय तिंरदाजी संघटनेवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.