कमल कचोलिया ः चाकण उद्योग पंढरीत सुरक्षा सप्ताहास प्रारंभ
महाळुंगे इंगळे – वेळ, श्रम व साधनांचा काटेकोरपणे उपयोग करून कंपनी अथवा कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी स्वतःच्या सुरक्षतेकरीता कंपनीकडून वेळेवर साधने मिळण्यासाठी खातेप्रमुखांकडे आग्रह धरावा, की जेणेकरून कारखान्यामध्ये कोणतीही विचित्र घटना घडणार नाही.
विशेष म्हणजे कामगारांनी सुरक्षिततेला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याची नितांत गरज आहे, असा सल्ला चाकण इंडस्ट्रीज असोशिएशनचे माजी अध्यक्ष व एनटीबी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कमल कचोलीया यांनी दिला.
आंतराष्ट्रीय नकाशावर सातत्याने नाव झळकत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील चाकण येथील सिरेमिक्स सेलचे प्राधान्याने उत्पादन घेणाऱ्या एनटीबी हायटेक सिरेमिक्स या कंपनीत 4 ते 11 मार्च या सलग आठ दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक सुरक्षा सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना कचोलीया बोलत होते.
प्रारंभी कामगारांनी एकत्रित येवून सुरक्षा विषयक शपथ घेतली. काम करताना तेथील परिसर स्वच्छ, नीटनेटका, सर्वांग सुंदर व टवटवीत ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार यावेळी कामगारांनी केला.
कचोलीया म्हणाले, कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेतले जाते. त्या उत्पादन प्रक्रियेत कामगारांचा सहभाग असायलाच हवा. सुरक्षतेच्या दृष्टीने कामगारांनी कंपनी कडून वेळेवर साधने मिळण्यासाठी सुपरवायझर अथवा खातेप्रमुख यांच्याकडे आग्रह धरणे अपेक्षित असून, त्यामध्ये प्रामुख्याने हातमौजे, मास्क, बूट, अन्य साधनांचा समावेश असावा.
सिद्धाराम चडचने व रवींद्र कांबळे यांनी यावेळी सांगितले की, सुरक्षा सप्ताह कालावधीत मॉकड्रील, बोधवाक्य स्पर्धा, व्यसनमुक्ती व सुरक्षा या विषयवार जनजागृतीसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. सिद्धाराम चडचणे यांनी प्रास्ताविक, तर रवींद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.