नवी दिल्ली – पश्चिम विभागाला मानाची दुलीप करंडक स्पर्धा जिंकून देणारा मुंबईकर कर्णधार अजिंक्य रहाणे याच्याकडे बीसीसीआय सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. इराणी करंडक स्पर्धेतील सामन्यासाठी शेष भारत संघाचे नेतृत्व हनुमा विहारीकडे सोपवण्यात आले आहे.
या स्पर्धेत रणजी करंडक विजेत्या सौराष्ट्र संघाचा शेष भारत संघाशी येत्या शनिवारपासून सामना रंगणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे इराणी करंडकाचे सामने गेले तीन मोसमांत खेळवले गेले नव्हते. यंदा रहाणेच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभाग संघाने दुलीप करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. मात्र, तरीही रहाणेचा शेष भारत संघात समावेशही करण्यात आलेला नाही.त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
बीसीसीआयने शेष भारत संघाची घोषणा केली. या संघात मुंबईचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि सर्फराज खान यांना स्थान दिले आहे. तसेच युवा (19 वर्षांखालील) विश्वचषकात विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या यश धूलचाही शेष भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
शेष भारत संघ – हनुमा विहारी (कर्णधार), मयंक आग्रवाल, प्रियांक पांचाळ, अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जयस्वाल, यश धूल, सर्फराज खान, के. एस. भरत (यष्टीरक्षक), उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), जयंत यादव, सौरभ कुमार, साई किशोर, मुकेश कुमार, उमरान मलिक, कुलदीप सेन, अरझान नागवासवाला.