नवी दिल्ली – पुरुष खेळाडूंसाठी आयपीएल स्पर्धा गेल्या 12 वर्षांपासून सुरु आहे. आता त्याच धर्तिवर महिलांची आयपीएल देखील घेण्यात यावी अशी मागणी पुढे येत होती व त्याला बीसीसीआयनेही तत्त्वतः मान्यता दिली होती, आता याचीच प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे स्पष्टीकरण भारताच्या महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांनी दिले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पुरुषांच्या आयपीएलमध्ये महिला संघातील खेळाडूंचे चार टी-20 प्रदर्शनिय सामने खेळविण्यात आले होते. यंदाच्या स्पर्धेत सात सामने खेळविले जाणार होते. मात्र, करोनाच्या संकटामुळे आयपीएल स्थगित करण्यात आल्याने आम्ही खूपच निराश झालो आहोत. मात्र, बीसीसीआयने सकारात्मकता दाखविल्याने करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर महिलांचेही सामने खेळविले जातील, असा विश्वासही अंजुमने व्यक्त केला.