नवी दिल्ली – केंद्र सरकारने खूप पूर्वीच सरकारी मालकीची एअर इंडिया ही विमानकंपनी विक्रीला काढली आहे. पण ती कंपनी लिलावात घेण्यासाठी कोणी पुढेच न आल्याने या लिलावाला मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्याचीही मुदत संपत आल्याने सरकारने आता या लिलावाला पुन्हा 30 जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. ही कंपनी विकण्यासाठी देण्यात आलेली ही दुसरी मुदतवाढ असून गेल्या 27 जानेवारी पासून ही विक्री प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्याच्या करोना स्थितीमुळे ही मुदतवाढ दिली जात असल्याचे सरकारच्या संबंधीत विभागाने म्हटले आहे. सरकारने सन 2018 मध्येही एअर इंडिया विकायला काढली होती. पण त्याही वेळी त्यांना योग्य ग्राहक मिळू शकला नव्हता. त्यामुळे त्यांना हा विक्री प्रस्ताव त्यावेळी मागे घ्यावा लागला होता. जानेवारी 2020 मध्ये सरकारने ही कंपनी विकण्यासाठी पुन्हा निकराचा प्रयत्न सुरू केला आहे.