नवी दिल्ली :- रिओ ऑलिम्पिकच्या वेळी खेळाडू नवखे होते त्यामुळे तेव्हा यश मिळाले नाही. मात्र, आता खेळाडू परिपक्व झाले आहेत. पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा महिला संघ पदक निश्चितच जिंकेल, असा विश्वास भारताच्या महिला हॉकी संघाची गोलकिपर सविता हिने व्यक्त केला आहे.
रिओ स्पर्धेत भारतीय संघातील अनेक खेळाडू नवख्या होत्या. त्यांना प्रत्यक्ष स्पर्धेचा व दडपण हाताळण्याचा अनुभव नव्हता. मात्र, गेल्या चार वर्षांमध्ये संघाने अनेक स्पर्धांमध्ये सरस कामगिरी केली आहे. त्यातून खेळाडूंना खूप काही शिकायला मिळाले आहे. आता संघ नवखा नसून अनुभवी बनला आहे.
या संघाला गेल्या चार महिन्यांपासून करोनाच्या धोक्यामुळे स्पर्धा खेळता आलेल्या नाहीत तसेच सरावही करता आलेला नाही. मात्र, एकदा करोनाचा धोका संपुष्टात आला व सराव आणि स्पर्धा सुरू झाल्या की खेळाडू पुन्हा विविध स्पर्धांसाठी सज्ज होतील. पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा महिला हॉकी संघ पदक निश्चितच जिंकेल, असा विश्वास सविताने व्यक्त केला.