पुणे : रेल्वेच्या (Railway) प्रवासादरम्यान अनेकवेळा घाई प्रवाशांच्या जीवावर बेतते. अशीच एक घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे. पुणे रेल्वे स्टेशन येथे मंगळवारी चालत्या प्रगती एक्सप्रेसमध्ये बसत असताना एक महिला घसरून रेल्वे गाडी व प्लॅटफॉर्मच्या दरम्यान अकडली. पण, त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवान विनोदकुमार मीना यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले.
या घटनेत महिलेच्या पोटाला आणि पायाला जखम झाली आहे. राजलक्ष्मी दीपक नायर (वय ३५, रा. येरवडा) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. नायर या मुलगी व पतीसोबत प्रगती एक्सप्रेसने मंगळवारी सकाळी मुंबईला निघाल्या होत्या. फ्लॅटफॉर्म क्रमांक पाच येथे सकाळी सात वाजून 52 मिनिटांनी प्रगती एक्सप्रेस रवाना होत होती.
रेल्वे सुरू झाल्यानंतर नायर, त्यांची मुलगी आणि पती हे धावत आले. ते चालत्या रेल्वेमध्ये बसू लागले. नायर यांनी पहिल्यांदा त्यांच्या मुलीला रेल्वेत बसविले. त्यानंतर त्या बसू लागल्यानंतर रेल्वे सुरू असल्यामुळे त्यांचा पाय घसरला. त्या थेट रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या दरम्यान आडकल्या. त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान विनोदकुमार मीना यांनी तत्काळ त्यांना ओढून त्यांना बाहेर काढले. यावेळी प्रवाशांनी त्यांना मदत केली.
राजलक्ष्मी नायर यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या पोटाला जखम झाली होती. त्यांना तत्काळ व्हीलचेअरवरून वैद्यकीय सुविधा केंद्र येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तेथे डॉ. माया रोकडे यांनी प्राथमिक उपचार केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी आरपीएफचे जवान विनोदकुमार मीना यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नायर यांचे प्राण वाचले. याबद्दल त्यांचे आरपीएफचे निरीक्षक ब्रिजभन रघुवंशी यांनी कौतुक केले.