दहिवडी -मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पेलत असताना व आजारी असताना आपल्याच लोकांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अशा प्रकारचे बंड करणे अशोभनीय आहे. नाराजीसंदर्भात समोर येऊन चर्चेतून मार्ग निघाला असता. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेच्या एकीसाठी सर्व मंत्री, आमदारांनी परत येण्याची गरज आहे. शिवसेना कोणाच्या जाण्याने संपत नसते. जिल्ह्यातून दोन आमदार या बंडात सहभागी असले तरी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील व जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी जिल्ह्यातील शिवसैनिक खंबीरपणे उभे राहतील, असे शिवसेनेचे युवा नेते शेखर गोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगिले.
गोरे म्हणतात की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची ताकद वाढवली. शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत बाळासाहेबांची उणीव भासू दिली नाही. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राज्यातील जनतेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.
त्यात राज्यावर करोनाचे संकट आले. या काळात व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत उपाययोजना केल्या. त्यांची तब्येत ठीक नव्हती. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असताना एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड केले. सत्तेचा उपभोग घेताना राष्ट्रवादी पक्षाने स्वार्थ साधत सर्वांनाच त्रास देण्याचे धोरण राबवलेय हे खरे आहे. परंतु, यावर असा निर्णय घेणे योग्य नव्हते. आम्हीही राष्ट्रवादीच्या त्रासाचा सामना केला आहे.
माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यावर उद्धव ठाकरे विश्वास दाखवत ताकद देत असतील तर जुन्या व निष्ठावंत लोकांना त्यांनी किती ताकद दिली असेल हे सांगण्याची गरज नाही.’ राष्ट्रवादीविरोधातली नाराजी व उध्दव यांच्याबाबतच्या गैरसमजाचा फटका आपल्या पक्षाला बसू नये यासाठी आपल्या निर्णयापासून माघारी फिरत आपल्या दैवताच्या पुत्राला साथ द्यावी, असे आवाहनही गोरे यांनी केले आहे.