ज्ञानेश्वर फड/ प्रीतम पुरोहित
सासवड –
होईन भिकारी।
पंढरीचा वारकरी ।।
हाचि माझा नेमधर्म।
मुखी विठोबाचे नाम ।।
हेचि माझी उपासना ।
लागे संतांच्या चरणा ।।
तुका म्हणे देवा ।
हीच माझी भोळी सेवा ।।
वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे. कितीही बिकट परिस्थिती ओढावली, तरीही ते वारी करणे सोडत नाहीत. प्रपंचाचे काहीही झाले तरी ते नित्यनेमाने वारी करतात. जगद्गुरू संत तुकोबारायांच्या अभंगाची प्रचिती वारीच्या वाटेवर असलेल्या दिवे घाट येथे आली. गळ्यात वीणा, डोक्यावर फेटा, मुखाने श्री विठ्ठलाचे नाम घेत 86 वर्षीय आजोबांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील सर्वांत अवघड टप्पा देवे घाट लीलया पार केला. त्यांच्या या भक्तीउर्जेबद्दल अन्य वारकऱ्यांनी नवल व्यक्त केले.
हरिभक्त लक्ष्मण मुळीक (वीरगाव, ता. पुरंदर, पुणे) यांना लहानपणापासून विठ्ठल भक्तीची आवड आहे. वयाच्या 26 व्या वर्षांपासून त्यांनी पंढरपूरची वारी सुरू केली. मुळीक हे हभप ताराबाई धुमाळ दिंडीत विणेकरीची सेवा करतात. सन 2019 च्या वारी काळात मुळीक हे वारीत सहभागी होते. तर, घरी यांच्या पत्नी आजारी होत्या. दरम्यान त्यांचे निधन झाले. ही माहिती समजताच एक दिवस गावी येऊन विधी कार्य पूर्ण करून मुळीक पुन्हा वारीत सहभागी झाले. मुळीक यांची काळजी घेण्यासाठी गेल्या 6 वर्षांपासून त्यांच्या बहीण रखुमाबाई सोबत असतात. दिनकर पांडुरंग धसाडे, भगवान ज्ञानोबा जमदाडे, अरुण समगिर हे वारकरी गेली 15-20 वर्षांपासून आजोबांसोबत वारी करतात.
दिवे घाट अनेकांना अवघड टप्पा वाटतो. पण, मला अजिबात थकवा येत नाही. मुखात भगवंताचे सतत नामस्मरण सुरू असते. पांडुरंगाचे दर्शन झाले की जीवन सफल झाल्यासारखे वाटते.
– ह.भ.प. लक्ष्मण मुळीक, ज्येष्ठ वारकरी
“मुळीक आजोबा प्रेमळ आहेत. ते आम्हाला खूप जीव लावतात. वारीच्या वाटेवर त्यांच्याकडे पाहिले की ऊर्जा मिळते. आता त्यांचे वय जास्त झाले आहे आहे. वारीतील अवघड टप्पा चालताना वीणा दुसऱ्याकडे देण्याची आम्ही विनंती करतो, पण ते स्वतःच वीणा घेऊन घाट सर करतात. त्यांच्यामुळे आमच्या गावासह पंचक्रोशीतील भाविकांना वारीची गोडी लागली. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. ते आषाढीसह महिन्याची पंढरपूर वारी करतात.
– दिनकर धसाडे, वारकरी
हभप ताराबाई धुमाळ दिंडी
या दिंडीची सुरुवात 1973 साली हभप ताराबाई धुमाळ यांनी केली. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा आणि आता नातू नेताजी धुमाळ हे दिंडीची सर्व व्यवस्था पाहतात. या दिंडीत 400हुन अधिक भाविक चालतात. त्यात प्रामुख्याने वीर, सोमेश्वर, पणदरे, पवईमाळ येथील वारकऱ्यांचा सहभाग असतो. लक्ष्मण मुळीक हे दिंडी सुरू झाली तेंव्हापासून विणेकरीची सेवा करतात.