पुणे -“राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची आवश्यकता आहे.
भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत आले पाहिजे,’ असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रामदास आठवले यांच्या हस्ते सुपूर्द केल्यानंतर, तसेच उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते.
याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, गटनेते गणेश बीडकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “पुण्याचा विस्तार होत आहे. त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात. पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन.