मुंबई – शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये देखील फूट पडल्याने राज्यातील राजकरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अशात शरद पवार यांनी पक्ष नव्याने उभा करण्यासाठी कंबर कसली आहे. याच अनुषंगाने उद्या ते बीड येथे सभा घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले. यावेळी अजित पवार पुन्हा परतले तर त्यांना स्वीकारणार का असा सवाल देखील पवारांना विचारण्यात आला.
आम्ही विरोधकांनी दोन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये इंडिया असं विरोधकांच्या एकजुटीला नाव देण्यात आलं. याच इंडियाची ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक पार पडणार आहे अशी माहिती शरद पवार यांनी दिली.उद्या बीडमध्ये सभा घेऊन मुंबईला परतणार असल्याचे देखील शरद पवार यांनी यावेळी सांगितले. मोदी सरकारच्या अनेक निर्णयांमुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याची खंत देखील यावेळी पवार यांनी व्यक्त केली. यामुळेच भाजप विरोधी जनमत तयार करण गरजेचं असल्याचे देखील यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले.
ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते,’मी पुन्हा येईन’ त्यानंतर ते आले पण त्यापेक्षा खालच्या पदावर आले असं म्हणत पंतप्रधान मोदी देखील पुन्हा येईन असं म्हणल्याची आठवण यावेळी शरद पवार यांनी करून दिली. २०१९ ला ज्याप्रमाणे अजित पवार यांनी पहाटेचा शपतविधी केला होता त्यानंतरही ते परत पक्षात आले होते त्याचप्रमाणे जर आताही ते पक्षात परतले तर त्यांना स्वीकाराल का ? असा प्रश्न यावेळी शरद पवारांना विचारण्यात आला.
अजित पवारांना पक्षात पुन्हा स्वीकाराल का ? यावर शरद पवार म्हणाले,”हा निर्णय पक्षाचा आहे, पक्ष निर्णय घेईल..एकटा व्यक्ती याबाबत निर्णय घेत नसतो” असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
इतर राज्यातील पक्षांची सरकार पाडणं हा कार्यक्रम सध्या मोदी सरकारन सुरु केला आहे. मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते आणि मोदी सरकार यावेळी बघ्याची भूमिका घेते यामुळे विरोधकांनी भाजप विरोधी जनमत तयार करण्याची राजकीय गरज असल्याचे देखील पवारांनी यावेळी सांगितले.