‘मराठी-अमराठी’वर बोलताना राज ठाकरेंनी MNSच्या पंजाबी तालुका अध्यक्षाला उभं केलं अन्…
MNS Punjabi Taluka Adhyaksha – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पनवेलमध्ये आयोजित मेळाव्यात मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती, रखडलेला मुंबई गोवा महामार्ग यासोबतच ‘मराठी’च्या मुद्द्यालाही हात घातला. यासोबतच आपली ‘मराठी’ची व्याख्या पुन्हा एकदा विस्ताराने सांगितले. मराठीच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी, मनसेच्या एका तालुका अध्यक्षाचे नाव घेतलं. विशेष म्हणजे मनसेचा हा तालुका अध्यक्ष मूळचा पंजाबी आहे. नवज्योत सिंग गौड असं या मनसे तालुका अध्यक्षाचं नाव आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘आपण महाराष्ट्रातली जमीन विकतोय, तिकडे प्रकल्प येत आहेत किंवा येतील पण… पण तिथल्या जमिनी ह्या परप्रांतीयांनी घेतल्या आहेत आणि तिकडे फायदे कोणाचा होणार तर परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार. मी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत. माझा मंडणगडचा अध्यक्ष तर एक पंजाबी आहे.’ असं त्यांनीसांगितलं.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख
कोकणामध्ये परप्रांतीयांनी घेतलेल्या जमिनींबाबत भाष्य करताना राज ठाकरे यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे उदाहरण दिले. ‘गोव्यात शेतजमीन बाहेरच्या लोकांना विकायची नाही असा कायदा तिथल्या मुख्यमंत्र्यांनी बनवला आहे. हा मुख्यमंत्री भाजपाचा, जो आमच्या गोव्याचे गुडगाव आण छत्तीसपूर होऊ देणार नाही असं विधान करतो. परंतु राज ठाकरे असं काही बोलला तर तो देशद्रोही ठरतो.’ असं राज ठाकरे म्हणाले.
पंजाबी तालुका अध्यक्षाचा आनंद गगनात मावेना
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान नाव घेत उभं करून अभिनंदन केल्याबाबत नवज्योत सिंग गौड यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्रात एवढे जिल्हे, तालुके आहेत. इतकी लोकसंख्या आहेत. त्यात एक मंडणगड तालुका, जो ग्रामीण आणि छोटा तालुका आहे. त्यात माझ्या नावाचा उल्लेख साहेबांनी केला त्याचा मला अभिमान वाटतो. मला बोलण्यासाठी शब्दही सुचत नाहीत. माझा जन्म महाराष्ट्रात झाला. जो परप्रांतीय टॅग लागलेला तो साहेबांमुळे दूर झाला. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यालाही साहेब इतकं मोठं व्यासपीठ देतात, राज ठाकरेंसारखा नेता देशात असेल वाटत नाही.’ अशी प्रतिक्रिया नवज्योत सिंग गौड यांनी व्यक्त केली.
मनसेचे आंदोलन
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केल्यानंतर मनसेतर्फे मुंबई गोवा महामार्गाची ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मुंबईतून कोकणमार्गे गोव्याला जाणारा हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी मनसेने आग्रही भूमिका घेतली आहे.





