मुंबई- “महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय हा राज्याचाच नव्हे तर देशहिताचा आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि मोठ्या राज्यात अघोरी प्रयत्न करुनही भाजपला सत्ता बळकविता आली नाही. कारण महाराष्ट्रातील जनतेचा रोष आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
उद्यापासून राज्यात एक नवा मुख्यमंत्री असेल, ठाकरेंचं सरकार राज्याप्रमाणे दिल्लीतही येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच “माझी जबाबदारी कमी झाली आहे. उद्यापासून पत्रकार परिषदांमधून नाही तर “अग्रलेखा’तूनच बोलणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सत्ता स्थापन करेपर्यंत संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू एकाकी लढवली. सरकार स्थापनेसाठी संजय राऊतांना वेगवेगळ्या पातळ्यांवर लढावे लागले. या काळात त्यांनी अनेक पत्रकार परिषद, बैठका आणि चर्चा केल्या.
संजय राऊत म्हणाले, आजपासून माझी जबाबदारी कमी झाली. उद्यापासून मी तुमच्याशी बोलणार नाही. सरकार नवीन येत असून राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळत आहेत. आता त्यांनी निर्णय घ्यायचे आहेत. सरकार आणि पक्ष संघटना वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करणार आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे काम करतील.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले याचा अर्थ परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. अघोरी प्रयत्न करुन भाजपने सत्ता राखण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्राच्या जनतेने तो उद्ध्वस्त केला. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा अघोरी प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडला, असे त्यांनी सांगितले.