मुंबई – करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असतानाच आज महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारतर्फे याबाबतचा आदेश जारी करण्यात आला असून सुधारित निर्बंध जाहीर करण्यात आलेत. या निर्बंधांची अंमलबजावणी 22 एप्रिल म्हणजेच रात्री आठ वाजल्यापासून होणार झाली. हे नियम 1 मे सकाळी 7 पर्यंत लागू असतील. मात्र , 1 मे नंतरही राज्यात लॉकडाऊन वाढणार का असा प्रश्न मंत्री जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता.
यावर माध्यमांशी बोलतांना जयंत पाटील म्हणाले,’ राज्यातील वाढत्या रुग्ण संख्येबाबत आढावा घेतला जाणार आहे, हा आढावा सर्व जिल्ह्यांचा स्थानिक स्तरावर घेतला जाणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर पाटील यांनी दिले.
दरम्यान,गेल्या दोन महिन्यांपासून देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अनेकजण कोरोनामुळे दिवसरात्र मृत्यूशी झुंज देत आहे. या सर्वात सध्या राज्य सरकार व प्रशासनकडून युध्दपातळीवर उपाययोजना करत आहे. आता करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दि २६ एप्रिल २०२१ ला 71 हजार 736 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.