मंचर, (प्रतिनिधी) – उपोषणकर्त्यांचे जीव गेल्यावर भरपाई मिळणार का ?, अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांसह आदिवासी हिरडा उत्पादक शेतकऱ्यांनी उद्विग्न सवाल केला आहे.
किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील हजारो हिरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मंचर तालुका आंबेगाव येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणाच्या चौथ्या दिवशी रविवारी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. रक्ताच्या साखरेतील पातळी घसरली, प्रकृती अस्वस्थ होऊ नये म्हणून वैद्यकीय पथकाने विनंती करूनही उपोषणकर्ते मात्र उपोषण सोडायला तयार नाही. भरपाई घेतल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही, प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल असा निर्धार करत उपोषणकर्ते आपल्या उपोषणावर ठाम आहे. त्यामुळे मुर्दाड प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या उदासीनतेचा संताप आदिवासी उत्पादक शेतकरी आणि किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
डॉक्टरांची टीम मंचर उपविभागीय कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांच्या रूटीन चेकअपसाठी आली होती. किसान सभेचे प्रमुख पदाधिकारी आणि उपोषण कर्ते डॉ. अमोल वाघमारे यांच्या रक्तातील साखरेची पातळी घसरून ४९ वर आली होती. (साधारणपणे ७० पर्यंत असावी लागते) त्यांना अॅडमिट होण्याचा सल्ला देण्यात आला. परंतू त्यांनी त्याला स्पष्ट नकार देत उपोषणस्थळी बसून राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
आदिवासी हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. अमोल वाघमारे, भीमाबाई लोहकरे व कमलताई बांबळे या उपोषणाला बसलेल्या किसान सभेच्या या चिवट कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी हिरडा उत्पादक शेतकरी, सरपंच उपोषण स्थळी भेट देत आहे. किसान सभेचे प्रमुख अशोक पेकारी म्हणाले की, या वर्षी ५,४७,४५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला गरीब आदिवासी शेतकऱ्यांची १५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणे खरच एवढे अवघड आहे का ? दिलीप वळसे पाटलांसारखा मातब्बर राजकारणी मागील ४० वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना हिरडा नुकसान भरपाईसाठी किसान सभेसारख्या एका शेतकरी संघटनेला प्रचंड संघर्ष करायला लागतो हे कशाचे द्योतक आहे ?
मतपेटीतून धडा शिकवा
हिरडा नुकसान भरपाईसारख्या विषयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या व उपोषण करून कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात घालायला लावणाऱ्या राज्यकर्त्यांना व लोकप्रतिनिधींना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे. असा संताप जनक संवाल किसान सभेचे पदाधिकारी अविनाश गवारी, हिरडा उत्पादक शेतकरी विश्वनाथ निगळे व रामदास लोहकरे यांनी व्यक्त केला.