नवी दिल्ली: केंद्र सरकारने तयार केलेल्या नव्या कृषी धोरणाच्या विरोधात देशात मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.देशात एकीकडे करोनाचा कहर सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत.
ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. राकेश टिकैत आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत राकेश टिकैत यांनी प्रचारात सहभाग नोंदवला होता. तसेच भाजपविरोधी मतदान करण्याचे आग्रही आवाहन केले होते. इतकेच नव्हे, तर मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा दावाही केला होता.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपला जोरदार टक्कर देत ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. त्यामुळे मोदींविरोधात एक मजबूत पर्याय तयार झाला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वाराणसी येथून पंतप्रधान मोदींविरोधात ममता बॅनर्जी निवडणूक लढवू शकतात, असा अंदाजही वर्तवला जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये राकेश टिकैत यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे सांगितले जात आहे.