उंडाळे – रयत कारखान्याच्या निवडणुकीमुळे कराड दक्षिण मधील राजकीय वातावरण चांगलाच रंग भरला आहे. स्वर्गीय विलासकाका यांच्या निधनानंतर उंडाळकर घराण्याला जणू ग्रहणच लागल्याचे दिसून येत आहे. गेली पस्तीस वर्ष एक हाती सत्ता असलेल्या दक्षिणेत अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी व गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांना काकांच्या निधनानंतर काही दिवसातच सत्तेचे डोहाळे लागले. त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत म्हणजे ग्रामपंचायत, सोसायटी असो किंवा होणारी शामराव पाटील पतसंस्था त्याचबरोबर रयत कारखाना निवडणूकिला चांगलाच राजकीय रंग आलेला आहे.
सुरु असलेल्या रयत सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीत स्व. विलासराव काका यांचे पुतणे राजाभाऊ पाटील यांनी विलासराव पाटील यांचे कृष्णाकाठचे व उत्तरेतील राजकीय विरोधक असणाऱ्या अनेकांना हाताशी धरून काकाप्रेमी गटाला शह देण्यासाठी स्वतःच्याच चुलत बंधू रयत कारखान्याचे विद्यमान चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील यांच्याविरोधात प्रत्येक निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. या आधि झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उदयसिंह पाटील यांना शह देण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना उघडपणे साथ दिली होती. त्यावेळी उदयसिंह यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
परंतु त्यानंतर झालेल्या दक्षिणेतील अनेक सोसायटी निवडणुकात राजाभाऊ पाटील यांना मोठा पराभव पत्करावा लागला आहे. तरीही अनेक वेळा काकाप्रेमी गटाला शह देण्याचा प्रयत्न राजाभाऊ पाटील करत आहेत. सुरु असलेल्या रयत सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत राजाभाऊ पाटील यांनी त्यांच्या गटात गटामार्फत 32 उमेदवारी अर्ज तर रयत कारखान्याचे विद्यमान चेअरमन उदयसिंह पाटील गटाकडून 21 जागांसाठी 24 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
21 जागांसाठी दोन्ही गटाकडून तब्बल 59 अर्ज दाखल झाले आहेत. विलासकाका यांच्या निधनानंतर झालेली जिल्हा बॅंक असो वा सोसायटी निवडणुका असो यामध्ये ऍड उदयसिंह पाटील यांना शह देण्यासाठी कराड दक्षिण सह उत्तर मधील अनेकांनी राजाभाऊंच्या हातात हात देऊन मोठी मोट बांधली आहे. परंतु इथून मागील झालेल्या निवडणुका पाहता उदयसिंह पाटील यांच्या गटाने कराड दक्षिणेतील राजकारणात मजबूत पकड करून ठेवली आहे. त्यामुळे काकांच्या निधनानंतरही दक्षिणेत आपला गट राखण्यात उदयसिंह यशस्वी ठरले आहेत. याआधि झालेल्या निवडणूकात राजाभाउ उंडाळकरांना यश आले नाही. येणाऱ्या काळात यश मिळेल का हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र रयत साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतरच कराड दक्षिणेतील वर्चस्व कोणाकडे राहील हे चित्र स्पष्ट होईल.