वडूज -मायणी, ता. खटाव येथील मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या गुन्ह्यात आ. जयकुमार गोरे यांनी सोमवारी स्वतः पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांच्यासमोर वडूज पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवला. या प्रकरणी आ. गोरे यांची तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली.
याबाबत माहिती अशी, मायणी येथील मृत भिसे यांच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करून कुटुंबाची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व दोन अनोळखी व्यक्तींवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे. या गुन्ह्यात संजय काटकर, दत्तात्रय घुटुगडे व महेश बोराटे यांना यापूर्वी अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आ. जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही हा अर्ज फेटाळून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. या प्रकरणी आ. गोरे यांनी सोमवारी पोलिसांसमोर जबाब नोंदवला. त्यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी दि. 1 जुलै रोजी होणार आहे.