मुंबई – गत अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. हे दोघे बंधू एकमेकांच्या सुखदुःखात नेहमीच एकत्र येतात. पण राजकारणात नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करतात. आता पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. निमित्त होते त्यांच्या भाच्याच्या साखरपुड्याचे.
दरम्यान यावेळी त्यांचा एकत्र उभा असलेला फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत असून ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मुद्यावरून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या,’माझ्या नंणदेच्या मुलाचा साखरपुडा होता. घरातील सर्व लोक अशावेळी एकत्र येतात. माझी नणंद राजकारणात नाहीये. राज जसा तिचा भाऊ आहे, तसा उद्धवही भाऊ आहे’, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तसंच, उद्धव आणि राज एकत्र येणार का? असं विचारलं असता शर्मिला ठाकरे यांनी “बघुया…”, एवढंच एका शब्दात उत्तर दिलं.
तत्पूर्वी, आदित्य ठाकरेंविषयी शर्मिला ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंचा सहभाग असले असं मला वाटत नाही, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. यावरून उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटातील अनेकांनी शर्मिला ठाकरेंचे आभारही मानले होते.