नवी दिल्ली – देशातील कोरोना विषाणू संकटामुळे लांबणीवर पडलेली आयपीएल स्पर्धा अखेर युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच चैन्नई सुपर किंग्स संघापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिल्याचं चित्र आहे. फिरकीपटू दीपक चहर याच्यासह १३ जणांना कोरोना बाधा झाल्याचे उघड झाल्यानंतर फलंदाज सुरेश रैना याने स्पर्धेतूनमाघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
अशातच आता संघाचे मालक एन श्रीनिवासन यांनी रैना परतणार का? याबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. श्रीनिवासन म्हणतात, “रैना हा मला मुलाप्रमाणे आहे, मात्र त्याला संघामध्ये पुन्हा स्थान द्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनातर्फेच घेतला जाईल.”
तत्पूर्वी, गट सप्ताहात सुरेश रैना याने व्यक्तिगत कारणांचा दाखल देत आयपीएलमधून बाहेर पडत असल्याची आकस्मित घोषणा केली होती. रैनाने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर खेळाडूंकडून ‘बायो’ सुरक्षाकवचाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र खेळाडूंनी या चर्चा स्पष्टपणे नाकारल्या आहेत.
दरम्यान, रैनाने स्पर्धा सोडण्याची घोषणा केल्यानंतर कठोर भूमिका घेणाऱ्या श्रीनिवासन यांनी आता आपली भूमिका मवाळ केल्यानं रैनाचे स्पर्धेत पुनरागमन होणार अशी चर्चा सुरु आहे.
असं असलं तरी श्रीनिवासन यांनी रैनाच्या पुनरागमनाचा चेंडू धोनीच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाच्या कोर्टात ढकलला आहे. आता संघ व्यवस्थापन रैनाला पुनरागमनाची संधी देणार की नाही याकडेच क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.