नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई केरात त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. या प्रकरणावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नुपूर शर्माला अटक करावी, अशी मागणी केली आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मागणी केली आहे.
मुलाखती दरम्यान,”नुपूर शर्माने माफी मागितली नसून तिने आपल्या वक्तव्यात इंग्रजीत ‘इफ’ लिहिल्याचे” ओवेसी यांनी सांगितले. पुढे बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “हे सरकार बुलडोझरचे राजकारण करते. काही झालं की बुलडोझर सुरू होतो, मग आता नुपूर शर्माच्या घरावर बुलडोझर चालवणार का? असा खोचक सवाल त्यांनी यावेळी सरकारला केला. तसेच पुढे बोलताना, जेव्हा देशातील मुस्लिमांचा प्रश्न येतो, तेव्हा पंतप्रधान मोदी त्यांचे ऐकत नाहीत. पंतप्रधानांना भारतीय मुस्लिमांचे दुःख कळत नाही. भाजपने देशातील मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ओवेसी यांनी, नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई झाली असती तर, कानपूरमध्ये हिंसाचार झाला नसता. आता तेथील मुस्लिमांवर एनएसए लादले जात आहे. कानपूर प्रकरणात मी योग्य आणि चुकीचा निकाल देऊ शकत नाही. आम्ही हिंसाचाराच्या पाठीशी उभे नाही. सरकारने आधी काही केले असते तर हिंसाचार झाला नसता, असे आम्ही म्हणत आहोत. आधी कारवाई झाली असती तर ही गोष्ट संपली असती, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.
नुपूर शर्मा यांना पक्षातून हाकलून द्यावं लागलं हे भाजपला नंतर का आठवलं, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. भाजप आपल्या लोकांना जाऊन शिवीगाळ करायला सांगते, भाजप आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील वादविवादांमध्ये द्वेषपूर्ण भाषण देण्यास सांगतो. पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. राजकीय पक्ष या विषयावर काहीही बोलले नाहीत, कारण त्यांची हिंदू मते गेली असती असा आरोपही यावेळी ओवेसी यांनी केला आहे.