नवी दिल्ली – पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. जम्मू-काश्मिरमध्ये कलम 370 पुन्हा लागू केले जात नाही, तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा मुफ्ती यांनी केली आहे. येत्या काळात विधानसभा निवडणुका होतील, असे मला वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुफ्ती यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जी-20 हा देशाचा कार्यक्रम आहे, कोणत्या एखाद्या पक्षाचा नाही. ही सार्क देशांची परिषद आहे, जी या प्रदेशात आपल्या देशाचे नेतृत्व प्रस्थापित करेल. परंतु भाजपाने हा कार्यक्रम हायजॅक केला आहे. त्यांनी त्याचा लोगो बदलून कमळाचे फूल टाकले आहे. वस्तुत: हा लोगो देशाशी संबंधित असायला हवा होता, अशी टीका मुफ्ती यांनी केली. भारताची विचारसरणी टिकवण्याची जबाबदारी इतर पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेसची अधिक आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
कुमार विश्वास यांच्याकडून समाचार
प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. तुम्ही फक्त शेवटच्या श्वासापर्यंत या निर्णयावर ठाम राहा. हा निर्णय पुढे घेऊन जा, असे तुम्ही तुमच्या मुलांनाही जायच्या आधी सांगा. काश्मीरच्या समृद्धीसाठी तुम्ही आणि तुमच्यासारख्या दोन्ही कुटुंबांनी आयुष्यभर “माजी’ बिरुद लावून, केलेल्या या अभूतपूर्व त्यागाचे काश्मीरची जनता सदैव स्मरण ठेवेल, अशी खोचक टीका कुमार विश्वास यांनी केली आहे.