प्रशांत जाधव
सातारा – राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभुराज देसाई सोमवारी (दि. 13) सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या कार्यालयाने याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांना पत्र पाठवून सूचना केल्या आहेत. ना. शंभूराज देसाई व पोलीस दलाचे असलेले सख्य जिल्ह्याने अनेकदा अनुभवल्याने त्यांनी बोलवलेल्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ना. शंभूराज देसाई यांनी कायमच पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर आणि पध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. परिणामी देसाई यांनी विधानसभेतही पोलिसांविरोधात आवाज उठवला होता. मग, साताऱ्यातील पोवई नाक्यावर त्यांच्या कारच्या काचांना लावलेले काळे फिल्मिंग असो किवा त्यांची गाडी हटकण्यासाठी येणारे वाहतूक कर्मचारी. त्यांच्यात आणि देसाईंच्यात संघर्ष कायम राहिला आहे. त्यात सातारा शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन कारभारी सपोनि युवराज हांडे यांच्यावर तर सक्तीच्या रजेवर जाण्याची वेळ आली होती. दरम्यानच्या काळात पोलीस देसाई यांच्यापासून चार हात लांबच राहिल्याने हा संघर्षही काही काळासाठी थांबला होता.
मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देसाई विजयी झाल्यानंतर पाटण शहरातून त्यांची विजयी मिरवणूक निघाली. तेव्हा काही उत्साही कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याने राडा झाला होता. त्यानंतर पाटण पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने त्यांना सोडवण्यासाठी खुद्द देसाईंनी पोलीस ठाण्याच्या आवारात तळ ठोकला होता.
माझ्या कार्यकर्त्यांना सोडल्याशिवाय मी जाणार नाही, असा पवित्रा देसाईंनी घेतला तर त्याला पाटणच्या सपोनि तृप्ती सोनावणे यांनी विरोध दर्शवला. आणि पुन्हा देसाई- पोलीस वादाचा नवा अंक सुरू झाला. नेहमीप्रमाणे देसाई यांनी सोनावणे यांच्या बदलीची मागणी एसपी म्हणून तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली. पण सातपुते यांनीही त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. अन् हा वाद पोहचला थेट राज्याच्या विधानसभेत.
देसाई यांनी साताऱ्याच्या एसपी या लोकप्रतिनिधींचा सन्मान राखत नसल्याची तक्रार केली. त्याला प्रतिसाद म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लागलीच चौकशीचे आदेश दिल्याने पुढे काय होणार याकडे पोलीस दलाच्या नजरा लागल्या होत्या. त्यानंतर खातेवाटप झाले आणि आमदार देसाई नामदार झाले आणि तेही पोलिसांच्या गृह खात्याचेच. देसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा वाद पुन्हा उफाळून येईल का, अशी अटकळ अनेकांनी बांधली. अखेर देसाईंनी जिल्हा पोलीस दलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत खरच आढावा घेतला जाणार की नवे जुने राग आळवले जाणार, याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे.
एसपींसह आयजी देसाईंच्या भेटीला
पोलीस दल आणि देसाई यांच्यातील सुप्त संघर्षाची ठिणगी वणव्यात रुपांतरीत होऊ शकते याची कल्पना कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांना आहे. हा वणवा सोमवारच्या बैठकीत लागू नये, म्हणूनच कदाचित डॉ. वारके यांनी एसपी सातपुते यांच्यासह देसाईंच्या राहत्या घरी शुक्रवारी भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
चहाची गोडी प्रत्यक्षात येणार का?
एसपींच्याविरोधात ना. देसाई यांनी विधानभवनात तक्रार केल्यानंतर ते थेट मंत्री म्हणूनच साताऱ्यात दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी आयजी, एसपींनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांना साखरेचा चहा पाजल्याचे ना. देसाई यांनी सांगितले. त्यामुळे चहाची गोडी प्रत्यक्षात येणार का, हे सोमवारीच कळेल.