ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल यांचे मार्गदर्शन
पुणे – “वकिलीमध्ये यशस्वी होण्यासाठी मांडता येईल असे सूत्र ठरलेले नाही. जसे स्वयंपाक घरात पाककृती करण्यासाठी कोणता पदार्थ किती, कसा वापरायचा याचे पक्के सूत्र ठरलेले नाही, तसे वकिली क्षेत्रालाही हे लागू होते. वकिली करताना कायद्याचे मूळ आणि त्याची योग्य उकल समजून घेतली तर वकिलीच्या क्षेत्रात यश मिळवता येऊ शकते, असे विचार मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज येथे शनिवारी “डॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमाले’ अंतर्गत सिब्बल यांचे “वकिली कौशल्य (ऍडव्होकसी स्किल्स)’ या विषयावर शनिवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. भाग्यश्री देशपांडे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.
सिब्बल म्हणाले, “वकिली करताना मानवी भावनांचे कंगोरे वकिलाला समजून घेता आले पाहिजेत. तरच तो आपला मुद्दा न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडू शकतो. कायदा नेमका काय आहे, त्याची निर्मिती, तो तयार करण्यामागे कोणत्या भावना होत्या हे वकिलांनी समजून घेणे आवश्यक आहे. कायदा तोच असला तरी प्रत्येक दाव्यात त्याचे संदर्भ देताना गुन्ह्यामागील मानवी भावना नेमकी काय होती, हे वकिलाला मांडता आले पाहिजे. कायदेशीर बाजू मांडताना आपण स्वत: आपल्या विषयावर ठाम आहोत का, हे पाहिले पाहिजे.