नवी दिल्ली – देशभरात सर्वत्र लागू करण्यात आलेली टाळेबंदी येत्या 14 एप्रिलला संपत असली तरी ती पुन्हा 30 एप्रिल पर्यंत वाढवली जाणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने या आधीच दिले आहेत. तथापी सरसकट टाळेबंदी न वाढवता करोनाचा प्रादुर्भाव कोणत्या विभागात किती प्रमाणात झाला आहे याचा अंदाज घेऊन काही ठिकाणी टाळेबंदी शिथील केली जाण्याची शक्यताही सरकारी सूत्रांनी व्यक्त केली आहे. करोनाच्या प्रसारानुसार देशाच्या विविध भागांचे ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन असे विभाग पाडून त्यानुसार ही टाळेबंदी शिथील करण्याचा प्रस्ताव आहे असे सांगण्यात येते.
ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही हे जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. देशात अशा प्रकारचे चारशे जिल्हे असून तेथे अद्याप एकही करोनाचा रूग्ण आढळून आलेला नाहीं. त्यामुळे त्या भागातील लॉकडाऊन शिथील होऊ शकते. ज्या जिल्ह्यांमध्ये पंधरा पेक्षा कमी करोना रूग्ण आढळून आले आहेत आणि जेथे नव्याने रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे अशा जिल्ह्यांचा समावेश ऑरेंज झोन मध्ये करण्यात येणार असून तेथील संचार बंदी अंशत शिथील केली जाईल आणि त्या जिल्ह्यांमध्ये वाहतूक तसेच शेतकी कामे सुरू करण्याची अनुमती दिली जाणार आहे असे समजते. रेड झोन मधील विभागांमध्ये मात्र ही टाळेबंदी अधिक कठोर केली जाण्याची शक्यता आहे.
देशात सरसकट टाळेबंदी केल्याने त्याचा देशाच्या अर्थकारणावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने देशाची अर्थव्यवस्थाही काही प्रमाणात सुरू ठेवणे अगत्याचे असल्याने वेगवेगळे विभाग पाडून त्यानुसार टाळेबंदी उठवण्याची किंवा काही प्रमाणात शिथील करण्याची प्रक्रिया देशात राबवली जाण्याची शक्यता आहे.
कालच पंतप्रधानांनी म्हटले होते की,माझ्या पहिल्या भाषणात जान है तो जहॉन है असे विधान केले होते पण आता मात्र जान भी और जहॉन भी असा नवीन मंत्र आपल्याला जपावा लागेल असे त्यांनी म्हटले होते. या विधानाद्वारे त्यांनी काही भागातील अर्थकारण पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले होते, त्यानुसारच हे नवीन धोरण जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.