सीमावाद सोडण्यासाठी अजित डोवाल करणार चीनसोबत चर्चा
नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये लवकरच सीमा प्रश्नावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, भारताकडून विशेष प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या बैठकीला जाणार आहेत. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता चीन आणि भारत यांच्यातील सीमावाद सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला असल्याचे दिसत आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे व त्या राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयानंतर भारत-चीनमध्ये सीमा प्रश्नी ही पहिली बैठक होत आहे. भारताकडून अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या अनौपचारीक परिषदेआधी डोवाल आणि वॅंग यांच्यात ही बैठक होऊ शकते. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या दोन दिवसीय चीन दौऱ्यात सीमा प्रश्नावर बैठकीचा निर्णय घेण्यात आला.