नवी दिल्ली – बसपा नेत्या मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. लोकसभेव्यतिरिक्त राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकाही स्वबळावरच लढवल्या जातील असे मायावती यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
पंजाब आणि हरियाणामध्ये प्रादेशिक पक्षांबरोबर निवडणूक आघाडी करण्यास बसपा उत्सुक होती. मात्र या प्रादेशिक पक्षांनी सत्तारुढ “एनडीए’ आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या विरोधकांच्या “इंडिया’ शी जवळीक वाढवू नये ही पूर्व अट होती, असे मायावती म्हणाल्या.
मायावती यांनी “एनडीए’ आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या विरोधकांच्याही आघाडीवर टीका केली आहे. या दोन्ही आघाड्या दलित आणि मागास वर्गाच्या विरोधी आहेत, असा आरोप देखील मायावतींनी केला. भाजपच्या नेतृत्वाखालील “एनडीए’ आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील “इंडिया’ या दोन्ही आघाड्या केवळ स्वतःला सक्षम करू पहात आहेत. “बसपा’ कडून देखील गेल्या काही दिवसांपासून देशभर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे, असेही मायावती म्हणाल्या.
कॉंग्रेसने जातीयवादी भूमिका स्विकारली आहे आणि दलितांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. जर कॉंग्रेसने जातीय आणि भांडवलशाही विचार दूर ठेवला असता आणि गरीब, वंचितांच्या कल्याणाचा विचार केला असता आणि डॉ. आंबेडकरांचे ऐकले असते, तर बसपाला स्वतंत्र विचार करायला लागला नसता. त्यामुळे दलित आणि मागास वर्गाने बसपाला पाठिंबा द्यायला हवा. असेही मायावती म्हणाल्या.