नवी दिल्ली – भारताच्या “चांद्रयान 3′ मोहिमेकडे अवकाश संशोधनातील मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. “चांद्रयान 2’च्या अपयशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वच संबंधितांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून 14 जुलै रोजी “चांद्रयान-3’चे यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. दरम्यान, या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणारे काही कर्मचारी वर्षभरापासून विनापगारीच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
यासंदर्भात “द वायर’ने आयएएनएसच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. लॉंच पॅडच्या सहाय्याने “चांद्रयान-3’चे प्रक्षेपण करण्यात आले. तेच लॉंचपॅड बनवणाऱ्या कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पगारच मिळाला नसल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन (एसईसी) कंपनीने “चांद्रयान 3′ मोहिमेसाठी लॉंचपॅड तयार केले आहे. झारखंडच्या रांचीमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. मात्र, या कंपनीत निधीअभावी गेल्या 17 महिन्यांपासून कर्मचारी व अधिकाऱ्यांना पगारच देण्यात आलेला नाही.
दरम्यान, एसईसी ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून ती अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. रांचीच्या ध्रुव परिसरात ही कंपनी आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांना आवश्यक यंत्रसामग्री किंवा सुटे भाग पुरवण्याचे काम या कंपनीमार्फत केले जाते.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो, संरक्षण विभाग, रेल्वे विभाग, कोल इंडिया आणि देशातील स्टील उद्योगाकडून या कंपनीला जवळपास दीड हजार कोटींच्या ऑर्डर्स आल्याचेही सांगितले जाते. मात्र, तरीही कंपनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना पगार देण्यास असमर्थ ठरल्याचे या वृत्तात म्हटले आहे.