पिंपरी (प्रतिनिधी) – गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणारे मावळ व शिरूरचे दोन्ही उमेदवार यंदा बसपकडून निवडणूक लढविणार आहेत. उमेदवारी देताना लोकसभा निवडणुकीत दुसर्यांदा त्याच मतदार संघाकडून उमेदवारी न देण्याच्या वंचितच्या धोरणामुळे हे दोन्ही उमेदवार बसपकडून रिंगणात उतरणार असून, प्रस्थापितांबरोबरच वंचितच्या उमेदवारालादेखील आव्हान देणार आहेत. मावळमधून राजाराम पाटील तर शिरुरमधून राहुल ओव्हाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मावळ लोकसभा मतदार संघातून राजाराम पाटील यांनी निवडणूक लढवून 75,904 मते मिळविली होती. तर बसपकडून निवडणूक लढविणारे अॅड. संजय कानडे यांना 10,197 मते मिळाली होती. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वंतिच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने वंचितचे मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचितचे आव्हान नव्हते. तर बसपकडून टेक्सास गायकवाड यांनी 25982 मते मिळविली होती.
शिरूर लोकसभा मतदार संघातून गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितकडून रिंगणात उतरलेल्या राहुल ओव्हाळ यांनी 38,070 मते मिळाली होती. तर बसपच्या जमीरखान कागदी यांना 7274 मते मिळाली होती. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून वंतितने उमेदवार दिला नव्हता. तर बसपच्या सर्जेराव वाघमारे यांना या निवडणुकीत 19783 एवढी मते मिळाली होती.
शिरूर लोकसभा मतदार संघातून दुसर्यांदा वंचितकडून निवडणूक लढविण्यास मी इच्छूक होतो. मात्र, एकाच मतदार संघातून दुसर्यांदा त्याच उमेदवाराला उमेदवारी न देण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यामुळे मला वंचितने उमेदवारी नाकारली. निळ्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्यावर मी ठाम असून, मला बसपने उमेदवारी दिल्याने मी पुन्हा एकदा शिरूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. – राहूल ओव्हाळ बसप उमेदवार, शिरूर लोकसभा