कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मिळून स्थिर सरकार देतील
सांगली (प्रतिनिधी) – पलूस – कडेगावच्या जनतेने मला निवडणूक देत कामाची संधी दिली आहे. या जनतेच्या विकासासाठी मी पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने कायम झटत राहणार आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम विश्वजित कदम यांनी केले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपचे सगळ्यात जास्त आमदार निवडून दिले. तरीही भाजपला सत्ता स्थापन करता आला नाही. निवडणुकीचे निकाल लागून 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला. तरीही सरकार बनत नाही, हे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. तसेच आता कॉंग्रेस, राष्ट्रवादीने यात पुढाकार घेतला आहे. राज्याला पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी व सामान्य माणसांच्या प्रश्नाला प्राधान्य देत किमान समान कार्यक्रम आखण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विश्वजित कदम यांनी सांगली येथील वसंतदादांच्या समाधीचे दर्शन अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विश्वजित कदम म्हणाले, कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा व किमान समान कार्यक्रम आखण्याचे काम दोन्ही कॉंग्रेस मिळून करत आहे. निवडणूक निकालानंतर भाजपकडे सर्वाधिक आमदार होते, तरीही त्यांनी सरकार स्थापन करण्यात अपयश आले. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. सद्य स्थितीत शेतकरी, सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी, राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे. यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्यात येत आहे.
विचारधारा वेगवेगळी असलेले पक्ष जनतेच्या प्रश्नावर एकत्र येत असतील तर त्यात चुकीचे काही नाही. भाजपने काश्मीरमध्ये पीडीबी बरोबर सत्ता स्थापन केली, त्यापूर्वी केंद्रात सरकारने नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मंत्री होते, काही राज्यात भाजपला सरकारमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मंत्री होते. काही राज्यात भाजपला बहुमत नसतानाही त्यांनी मोडतोड, तडजोड करून सत्ता मिळवली. त्यावेळी कुठे होती विचारधारा? त्यामुळे सध्या महाराष्ट्रात शेतकरी व सामान्य माणसासाठी तातडीने सरकार बनने आवश्यक आहे. नुसतेच सरकार नको तर ते पाच वर्ष टिकणारे हवे म्हणून किमान समान कार्यक्रम ठरवला जात आहे.