संदीप मोरे
रहिमतपूर – खूप मोठ्या कालावधीनंतर राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सातारा दौरा झाला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर सातारा जिल्ह्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची पर्यायाने अजितदादांची खूप मोठी पकड होती. जिल्ह्यातील दोन खासदार व सात आमदार निवडून आणण्याची किमया राष्ट्रवादीने केली होती. परंतु काळाच्या ओघात जिल्ह्यावरील राष्ट्रवादी कॉंग्रेसची पकड ढिली झाली आहे. काल धामणेर (ता. कोरेगाव) येथे झालेल्या सभेत अजितदादा पवार यांनी हे स्वतःच कबूल केले. सातारा जिल्ह्यात एकमेव खासदार व फक्त तीन आमदार राष्ट्रवादीचे राहिले आहेत. पुणे जिल्ह्यापेक्षा सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीला भरभरून मते दिली हे नामदार अजितदादा यांनी कबूल केले होते. परंतु आमचे कुठे काय चुकलं का याचा याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे, असेही नामदार अजितदादा म्हणाले आहेत.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तब्बल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल सात आमदार असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संख्या फक्त तीन वर येऊन ठेपली आहे . याला कारण कॉंग्रेस व भाजप नसून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत नेत्यांची भांडणे याला कारणीभूत आहेत. एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या नादात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पक्षच खड्ड्यात घातला हे सत्य आहे. बहुचर्चित कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस मधीलच खासदार गट व आमदार गट या दोन्ही जिल्ह्यात गटांचा उभा वाद संपूर्ण जिल्ह्याला माहित झाला आहे. एकाच पक्षातील नेते दोन गटात विभागले गेले आहेत. त्यामुळे खासदार गटाचा उमेदवार आमदार गटाने पडायचा आणि आमदार गटाचा उमेदवार खासदार गटाने पडायचा एवढेच काम गेल्या अनेक वर्षात केले आहे. या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासाठी म्हणावे तेवढे प्रयत्न कधी झालेच नाहीत. त्यामुळे अजूनही दोन्ही गट एकमेकांची जिरवण्याच्या नादात पक्षाची जिरवतायेत हे नेत्यांच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे.
भाजप अध्यक्षांचे आव्हान पेलणार काय ?
सातारा जिल्ह्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले आमदार जयकुमार गोरे यांनी कॉंग्रेस सोडून भाजपचा रस्ता धरला. भाजपने त्यांना सातारा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदार दिली तेव्हापासून आमदार जयकुमार गोरे अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत. जिल्हाध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतल्याबरोबर आमदार जयकुमार गोरे यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत असे जाहीर सांगितले होते. कोरेगाव व कराड उत्तर मतदार संघातील कॉंग्रेस पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे आगामी काळात कॉंग्रेस संपवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी तयारीत राहणार आहेत त्यांचे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने कसे पेलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
जिल्हाध्यक्षांचे वजन संपले की काय ?
रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष सुनील माने गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर ठाण मांडून बसले आहेत. परंतु जिल्हा अध्यक्ष म्हणून सुनील माने यांना म्हणावा तेवढा प्रभाव पाडता आला नाही. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचे पक्षातील वजन संपले की काय? असा प्रश्न समोर येऊ लागला आहे. जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीत त्यांना स्वतःलाच स्वतःच तिकीट राखता आलं नाही. तेव्हापासून सुनील माने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात जास्त रमलेले दिसत नाहीत. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष म्हणून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सुनील माने यांची आहे. सुनील माने पदाला न्याय देऊन आक्रमकपणे पक्षाची बाजू व पक्षाचे ध्येय धोरणे सर्वांसमोर मांडतील अशी अपेक्षा राष्ट्रवादीतील अनेक नेते बोलून दाखवत आहेत.
===============