जांबूत -काठापूर खुर्द (ता. शिरूर) येथे नुकताच जय हनुमान यात्रोत्सव संपन्न झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये सुमारे तीनशे बैलगाडे धावले. घाटाचे उद्घाटन यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुदाम दाते, उद्योजक सागर दांगट, उपसरपंच राजाराम दाते, यशवंत दिघे, कोंडीभाऊ पवार, तात्याभाऊ दाते यांचे हस्ते झाले.
या यात्रोत्सवासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, अरूणा घोडे, माजी सरपंच दामू घोडे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद ढोमे आदींनी भेटी दिल्या.
यावेळी पार पडलेल्या शर्यतीमध्ये पांडुरंग काळे (गव्हाणवाडी), बाबाजी जाधव (जाधववाडी) हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तर स्व. पाटीलबुवा दाभाडे (पिंपरखेड), स्व. शंकर कुरकुटे आणि तुकाराम पोंदे यांनी द्वितीय, रोशनकुमार करंडे व टायगर ग्रुप बैलगाडा संघ लोणी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. घाटाचा राजा म्हणून तुकाईदेवी मित्रमंडळ पारगाव व कचर पानमंद (चांडोह) यांना बहुमान मिळाला.
आढळराव पाटील यांनी काठापूर खुर्द येथील मुक्ताईदेवी मंदिर व हनुमान मंदिर यासाठी प्रत्येकी 10 लाख रूपये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उद्योजक रवी दिघे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक दाते, दादाभाऊ दाते, कैलास कानसकर, दौलत दाते, विठ्ठल दाते, रुपेश दिघे यांचे शुभहस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. दरम्यान अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलाकारांची उपस्थिती
पिंपरखेडचे सुपुत्र प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट लेखक, दिग्दर्शक व निर्माते हेमंत ढोमे यांसह अभिनेत्री क्षिती जोग-ढोमे, आनंदी गोपाळचे दिग्दर्शक समीर विध्वंस, झिम्माचे सहनिर्माते अजिंक्य ढमाळ, चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नी नेहा मांडलेकर यांनी देखील उपस्थित राहून बैलगाडा शर्यतींचा आनंद लुटला.